भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूर’नंतर दिल्ली, पाटणासह अनेक महत्त्वाच्या विमानतळांवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता देशभरातील तब्बल 18 विमानतळावरची उड्डाणे रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. पण प्रशासनाने सर्व प्रवाशांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं आहे. विशेष म्हणजे लेह आणि लडाख येथील ऑल लडाख हॉटेल अँड गेस्टहाऊस असोसिएशनने प्रवाशांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विमानसेवा पूर्ववत होत नाही तोपर्यंत पर्यटकांना हॉटेल्समध्ये राहण्याची मोफत सुविधा उपलब्ध केली आहे.नवी दिल्ली : भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन सिंदूर’ केल्यानंतर सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा युरोप दौरा रद्द केला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमध्ये (POK) अनेक दहशतवादी ठिकाण्यांवर हल्ला केला. भारताने पाकिस्तान आणि POK मधील 9 दहशतवादी ठिकाणांच्या 21 कॅम्पवर मिसाइलने हल्ला केला. या हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी मारले गेल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी त्यांचा युरोपातील तीन देशांचा दौरा रद्द केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर आता काय होणार?, अशा चर्चा सुरू आहेत. या सगळ्या घाडमोडींदरम्यान केंद्र सरकारने देशातील 18 विमानतळांवरील उड्डाणे 10 मे पर्यंत रद्द केल्याची माहिती समोर येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ऑपरेशन सिंदूरनंतर घडत असलेल्या या घडामोडी आगामी काळातील नव्या घटनांचे संकेत देत असल्याची चर्चा आहे.
दिल्ली विमानतळावरून अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. पाकिस्तानातील दहशतवादी ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर अनेक परदेशी आणि देशांतर्गत विमान कंपन्यांनी दिल्लीहून ये-जा करणारी सुमारे 35 विमाने रद्द केली आहेत. यात दिल्लीहून जाणारी 23 देशांतर्गत विमाने आणि दिल्लीला येणारी 8 विमाने यांचा समावेश आहे. याशिवाय, रात्री 12 नंतरची 4 आंतरराष्ट्रीय विमाने देखील रद्द करण्यात आली. एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘अमेरिकन एअरलाइन्स’सारख्या परदेशी विमान कंपन्यांनी दिल्ली विमानतळावरून काही विमानांची उड्डाणे रद्द केली आहेत. दिल्लीचे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे देशातील सर्वात व्यस्त विमानतळ आहे. येथून दररोज सुमारे 1,300 विमानांची ये-जा असते.विमानतळ अधिकारी प्रवाशांच्या सुरक्षेबाबत खूप गंभीर आहेत. प्रवाशांना कोणताही धोका होऊ नये यासाठी ते शक्य ते सर्व उपाय करत आहेत. विमानांची उड्डाणे रद्द करण्याचा निर्णय देखील याच दिशेने उचललेले एक पाऊल आहे. प्रवाशांना त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा आणि विमानतळावर वेळेवर पोहोचण्याचा सल्ला देण्यात येत आहे. सुरक्षा तपासणीत थोडा जास्त वेळ लागू शकतो. दरम्यान, दिल्ली विमानतळावर विमानांची उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. पण विमानतळ प्रशासनाने प्रवाशांना सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. प्रवाशांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी हेल्प डेस्कची स्थापना करण्यात आली आहे.
पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर भारताने 7 राज्यांमधील 11 एअरपोर्टवर विमानांची उड्डाणे थांबवल्याची माहिती समोर आली होती. श्रीनगर, जम्मू, लेह, चंडीगड, बिकानेर, जोधपूर, राजकोट, धर्मशाला, अमृतसर, भुज आणि जामनगरमधील उड्डाणे थांबवण्यात आली आहेत. हे एअरपोर्ट पाकिस्तानच्या सीमेला लागून आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानमधील काही जिल्ह्यांमध्ये शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. देशातील महत्वाच्या संस्था आणि ठिकाणांची सुरक्षा वाढवली आहे. एअर इंडियाने 9 शहरांसाठीची सर्व उड्डाणे 10 मे रोजी सकाळी 05:29 पर्यंत रद्द केली आहेत. ही शहरे जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंडीगड आणि राजकोट आहेत. इंडिगो एअरलाइन्सची 160 विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. दिल्ली एअरपोर्टवर वेगवेगळ्या एअरलाइन्सची 20 विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. पण आता नव्याने आलेल्या माहितीनुसार 18 विमानतळांवरची उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.पाकिस्तानमध्ये भारताने दहशतवाद्यांवर कारवाई केल्यामुळे तणाव वाढला आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी नॉर्वे, क्रोएशिया आणि नेदरलँड या तीन देशांचा दौरा रद्द केला आहे. मोदी या देशांमध्ये महत्वाच्या बैठका घेणार होते. पण, दौरा रद्द करण्याचे कारण अजून समोर आले नाही. देशाच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला गेला असावा, असे मानले जात आहे. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी “अभी तो पिक्चर बाकी है” असं ट्वीट केलं आहे. त्यामुळे याबाबतचा सस्पेन्स आणखी वाढला आहे.‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वी झाल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवरची परिस्थिती बदलली आहे. पाकिस्तान आणि POK मध्ये असलेल्या दहशतवादी ठिकाणांवर भारतीय वायुसेनेने हल्ला केला. त्यामुळे गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. BSF, CRPF, ITBP, SSB आणि CISF जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व जवान सतर्क राहून ड्युटीवर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सीमावर्ती भागांमध्ये जास्त सुरक्षा ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू-काश्मीर, पंजाब आणि राजस्थानच्या सीमांवर जास्त सैनिक तैनात केले आहेत. रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, मेट्रो आणि महत्वाच्या ठिकाणांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.










