जळगाव जिल्ह्यातील अनधिकृत लाकूडतोड तात्काळ थांबवावे, उपवनसंरक्षण यांना मनसेचे निवेदन.महोदय, उपरोक्त विषयांन्वये आम्ही आपणास या अर्जाद्वारे सूचित करु इच्छितो की, सद्यस्थितीत जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड (कड्डु निंबाची) सर्रासपणे सुरु आहेत. याचा सर्व परिणाम हा जनतेला भोगावा लागत आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे राज्यामध्ये सर्वांत जास्त तापमानाची नोंद अनेक वेळा आपल्या जळगाव जिल्ह्याच्या नावावर होत असते व त्यास कारणीभूत गोष्ट म्हणजे आपल्या जळगाव जिल्ह्यात होत असलेली मोठ्या प्रमाणात वृक्षांची अवैधरित्या कत्तल हेच होय.याबाबत संबंधित अधिकारी वर्ग सुध्दा जबाबदार आहेत कारण ते याबाबत योग्य अशी कारवाई संबंधितांवर करत नसून यामुळे संबंधितांची ताकद वाढत असते व ते सर्रासपणे वृक्षांची अवैधरित्या कत्तल करुन त्याची विल्हेवाट जळगाव येथील अनेक सॉ मिल यांना पुरवित असतात.
यामध्ये संबंधित सॉ मिल व सदरील वृक्षांची कत्तल करणाऱ्यांची एक प्रकारे मिलीभगतच आहे. तसेच अनेक विट भट्ट्यावर देखील मोठ्या प्रमाणात निंबाचे लाकूड पडलेले आहे तरी याची सुध्दा चौकशी आपण तात्काळ करावी म्हणजे आपल्या लक्षात ही बाब येईलच.त्यामुळे सर्वांत महत्वाचे म्हणजे जळगाव येथील शिवाजी नगर भागातील सर्व सॉ मिल यांची या संदर्भात चौकशी करण्यात यावी. कारण संबंधित सॉ मिल मध्ये मोठ्या प्रमाणावर निंब वृक्षांचे लाकूड पडलेले असून याबाबत त्यांचेकडे सदरील वृक्षांचे तोडणी संदर्भात पास वगैरे नसल्याचे लक्षात येत आहे.
तरी आपणास बाद्वारे विनंती की, जळगाव जिल्ह्यामध्ये होत असलेली अवैध निंब वृक्षांची कत्तल तात्काळ थांबविण्यात यावी. तसेच जे काही वृक्ष परवानगी घेऊन काटण्यात येत असतील त्यांची रितसर वाहतूक करणाऱ्यांकडून आपला विभागाचा परवाना तपासण्यात यावा त्यानंतर सदरील वाहने ही पुढे पाठविण्यात यावी. सदरील निवेदन देतेवेळी जळगाव जिल्हाध्यक्ष जमिल देशपांडे. जिल्हा संघटक राजेंद्र निकम, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, महानगर संघटक श्रीकृष्ण मेंगडे, जिल्हाध्यक्ष शेतकरी सेना अविनाश पाटील, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष योगेश पाटील, ललित शर्मा, चेतन पवार, महेश माळी, संदीप मांडोळे, साजन पाटील, राहुल चव्हाण, पंकज चौधरी, खुशाल ठाकूर, लोकेश सोनवणे, जयेश राठोड, लोकेश पाटील, इ. उपस्थित होते.









