कामटवाडे गावासमोरील अमरधाम रस्त्यावर एका अल्पवयीन मुलाचा तीन ते चार जणांच्या टोळक्याने डोक्यात दाड व फरशी टाकून खून केल्याची घटना सोमवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. मार्च महिन्यात गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत संत कबीर नगर येथे झालेल्या खुनाचा बदला घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.करण उमेश चौरे (वय १७, संत कबीरनगर) हा अल्पवयीन तरुण गेल्या आठवडाभरापूर्वी खुनाच्या गुन्ह्यातून बालसुधारगृहातून सुटून आला होता.
स्वतःच्या जीवाला धोका असल्याबाबत करण याने आई-वडिलांना सूचित करून तो दोन दिवसांपूर्वीच कामटवाडे येथे त्याच्या मित्राकडे वास्तव्यास आला होता.सोमवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास तो कामटवाडे गावासमोरील स्मशानभूमी रस्त्याकडे जात असताना त्याठिकाणी पाळत ठेवून असलेल्या तीन ते चार जणांच्या टोळक्याने त्याच्यावर हल्ला चढवला. यावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या दगड व फरशी टोळक्याने करणच्या डोक्यात टाकल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, घटनेची माहिती समजताच उपायुक्त परिमंडळ २ मोनिका राऊत, सहायक आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राकेश हांडे, चुंचाळे पोलीस चौकीचे वरिष्ठ निरीक्षक मनोहर कारंडे, गुन्हे शाखा युनिट २ चे सहायक निरीक्षक हेमंत तोडकर यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. करणचा खून नेमका कशामुळे झाला, याचा पोलीस (Police) शोध घेत आहे. मारेकऱ्यांच्या शोधासाठी अंबड पोलीस ठाणे व गुन्हे शाखेचे पथक तयार करण्यात आले आहे.









