पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी, अतुल मोने, आणि संजय लेले यांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी हल्ल्याचा थरकाप उडवणारा अनुभव सांगितला. दहशतवाद्यांनी ‘हिंदू कोण?’ विचारून वडिलांना गोळी घातली अशी माहिती त्यांनी दिली‘आम्ही जमिनीकडे तोंड करून झोपलो होतो, माझा हात माझ्या बाबांच्या डोक्याजवळ होता. दहशतवाद्याने हिंदू कोण? असा प्रश्न विचारताच बाबांनी हात वर केला आणि त्याने माझ्या बाबांच्या डोक्यात गोळी झाडली. गोळी माझ्या हाताला घासून गेली. तत्पूर्वीच त्यांनी माझ्या दोन मामांना मारले होते…’ असा अंगाचा थरकाप उडवणारा घटनाक्रम पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी कथन केला. ‘त्या नराधमांना आणि सगळ्याच दहशतवाद्यांना दिसतील तिथे गोळ्या घाला, आम्हाला न्याय द्या,’ अशी मागणी त्यांनी केली.पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील हेमंत जोशी, अतुल मोने आणि संजय लेले या तिघांचा मृत्यू झाला. यात स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पळताना इतर नातेवाईक जखमी झाले आहेत. या सर्व नातेवाइकांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधला.










