पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यामध्ये २६ जणांचा बळी गेला. डोंबिवलीमधील मोने परिवाराने आपल्या घरातील माणसांना डोळ्यासमोर जाताना पाहिलं. त्यावेळी तिथे उपस्थित असलेल्या ऋचा मोने हिने त्यावेळी घडलेल्या थराराबाबत सविस्तरपणे सांगितलं.जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये २६ जणांना प्राण गमवावे लागले. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डोंबिवलीमधील तीन, पुण्याचे दोन तर पनवेलच्या एकाचा समावेश होता. डोंबिवलीमधील मरण पावलेले तीनही घरातील कर्ते पुरूष असल्याने त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मृत्यूमुखी पडलेल्या अतुल मोने यांच्या मुलीने त्यावेळी तिथे घडलेल्या सर्व थराराबाबत सांगितले आहे. आपल्या वडिलांना डोळ्यासमोर जाताना पाहिलेल्या ऋचाने सांगितलेला घटनाक्रमा ऐकून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.
आम्ही तिथे बराच वेळ होतो, सगळे लोक आनंद घेत होतो. आम्ही त्या ठिकाणाहून निघत होतो आणि अचानक फायरिंग सुरू झाली. सगळे लोक एका दिशेने पळत होते तर काही खाली झुकले, त्यावेळी आम्हीसुद्धा खाली झुकलो. मी दोन जणांना फायरिंग करताना पाहिलं, आम्ही जिथे एकत्र होतो त्या ठिकाणी आले आणि हिंदू कोण? मुस्लिम कोण? विचारू लागले. त्यावेळी माझ्या काकांनी (संजय लेले) हात वर केल्यावर डोक्यात गोळी मारली, त्यावेळी मी त्यांच्या मागेच होती. तेव्हा हेमंत काका हे त्यांना विचारायला गेले की काय झालंय तर त्यांनाही शूट केलं.









