जम्मू-काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्याने भारताने कठोर पाऊल उचललं आहे. अटारी चेक पोस्ट तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा परिणाम पाकिस्तानवर होणार असून भारत आणि अफगाणिस्तानच्या आयात-निर्यातीवरही याचा परिणाम होईल.जम्मू – काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांना आपला जीव गमवावा लागला. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात मोठं पाऊल उचललं आहे. भारत सरकारने अटारी चेक पोस्ट (ICP) तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. देशाच्या सुरक्षेशी संबंधित कॅबिनेट समितीने हा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी ही माहिती दिली. त्यांनी सांगितलं की, वैध कागदपत्रांसह सीमा ओलांडणारे १ मे २०२५ पूर्वी त्याच मार्गाने परत येऊ शकतात, परंतु हा मार्ग केवळ एका निश्चित कालावधीसाठी खुला राहील.
आता भारताच्या या निर्णयानंतर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारावर काय परिणाम होऊ शकतो. टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, अटारी बॉर्डर हा एकमेव जमीनी मार्ग आहे, ज्याद्वारे दोन्ही देशांमधील व्यापार होतो. अमृतसरपासून फक्त २८ किमी अंतरावर असलेलं अटारी हे भारतातील पहिलं भू-बंदर आहे आणि पाकिस्तानशी व्यापार करण्यासाठी एकमेव भू-मार्ग आहे. हे बंदर १२० एकरमध्ये पसरलेलं आहे. तसंच ते थेट राष्ट्रीय महामार्ग-१ शी जोडलेलं आहे.भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे, आधीच कमकुवत झालेल्या व्यापारी संबंधांना अटारी बॉर्डर बंद करण्याने मोठा धक्का बसणार आहे. अटारी चेकपोस्ट बंद करण्याच्या निर्णयाचा परिणाम दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या व्यापारावर अवलंबून असलेल्या लहान व्यापारी आणि उद्योगांवर होईल, असं सांगितलं जात आहे.२०२३-२४ मध्ये या बंदरातून ६,८७१ मालवाहू वाहनं गेली आणि ७१,५६३ लोकांनी या मार्गाने प्रवास केला.









