
कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे वॉटर टँकरवर अवलंबून असणाऱ्या सोसायटी, झोपडीधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मालाड, अंधेरी ओशिवरा, कांदिवली, चांदिवलीत पाण्याचा फटका बसला आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात धरणात कमी पाणीसाठा आणि वाढत्या पाण्याच्या मागणीमुळे मुंबईतील अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होऊ लागला आहे. त्याचा फटका मुंबईतील काही भागातील सोसायटी, झोपडीधारकांना बसत असतानाच वॉटर टँकरच्या संपामुळे त्यात आणखी भर पडली आहे. कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे वॉटर टँकरवर अवलंबून असणाऱ्या सोसायटी, झोपडीधारकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. मालाड, अंधेरी ओशिवरा, कांदिवली, चांदिवलीत पाण्याचा फटका बसला आहे.मुंबईतील विहिरी आणि बोअरवेलमधून पाणी काढण्याआधी केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेत नसल्याने महापालिकेने पाणी टँकरमालकांना कारवाईची नोटीस बजावली आहे. ही नोटीस मागे घ्या, यासह विविध मागण्या मुंबई वॉटर टँकर असोसिएशनने मुंबई महापालिका, राज्य सरकार आणि केंद्रीय भूजल प्राधिकरणाकडे केली आहे. यावर तोडगा निघू शकला नसल्याने अखेर गुरुवारपासून टँकर असोसिएशनने संप पुकारला.
संपाच्या दुसऱ्या दिवशी त्याचा काही प्रमाणात फटका बसला.मुंबईत सध्या काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सोसायटी व झोपडपट्टीधारकांना पाणी समस्या जाणवत असून वॉटर टँकरशिवाय पर्यायही नाही. चांदिवलीतील लिलियम लँटाना को. ऑप. सोसायटीत गेल्या दोन महिन्यांपासून पाणी समस्या असून कमी दाबाने पाणी येत आहे. त्यामुळे या सोसायटीकडून येथील ३२० फ्लॅटधारकांसाठी महिन्यातून काही दिवस पाण्याचे टँकर मागविले जात आहेत. मात्र आता वॉटर टँकर अससोसिएशनचाही संप असून सोसायटीसमोर पर्यायच राहिलेला नाही.चांदिवली वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक मनदिप सिंग मक्कर यांनी, गेल्या काही महिन्यापासून अत्यंत कमी दाबाने येत असल्याचे सांगितले. महापालिकेच्या एल वॉर्डकड़ेही सुरळीत पाणीपुरठ्यासाठी अर्ज केले असून अद्याप हा प्रश्न सुटलेला नाही. त्यामुळे वॉटर टँकरने पाणी पुरवठा काही वेळा केला जातो. गेल्या दोन महिन्यात चार लाख रूपयोंपेक्षा जास्त रक्कम पाण्याच्या टँकरवर खर्च केले आहेत. आता तर टँकर चालकांचाही संप असून पाण्याचा प्रश्न सुटणार कसा असा प्रश्न आम्हालाच पडल्याचे मक्कर म्हणाले.
‘मालाडमधील पठाणवाडी, कोकणीपाडा, आप्पापाडा, संतोष नगर या झोपडपट्टी भागातही गेल्या काही दिवसांपासून महापालिकेकडून अत्यंत कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. उकाडा वाढला आणि पाणी मागणी वाढली आहे. त्यामुळे या भागात पाणी समस्या जाणवू लागल्या आहेत’, असे भाजपचे माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी सांगितले. महापालिकेकडे मालाडमध्ये दोन टँकरच असून त्यातून पूर्व व पश्चिममध्ये पाणी पुरवठा होतो. हे दोन टँकर सर्व भागांसाठी पुरणार कसे असा प्रश्न आहे. आता खासगी पाणी टँकर चालकांचाही संप आहे. राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने ही समस्या सोडवण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. कांदिवली तसेच अंधेरी ओशिवरा येथील काही रहिवाशी इमारतीना कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने वॉटर टँकरवर अवलंबून आहेत. बीकेसीतील खासगी कार्यालयांनाही फटका बसला आहे.मरीन ड्राइव्ह-वरळी सागरी किनारा मार्गावर पार्किंग व्यवस्था, दोन अंतर्गत मार्गीका, स्वतंत्र पदपथ, सायकल ट्रॅक यासह अनेक कामे सुरू असून त्या कामासाठी खासगी पाण्याचे टँकर लागतात. तर धूळ प्रदूषण होऊ नये म्हणूनही पाण्याच्या टँकरच्या मदतीने पाणी फवारणी केली जाते. या सर्व कामावर परिणाम झाल्याची माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली. काही कामे बंद असल्याचे सांगितले. सागरी किनारा मार्गावर साइट ऑफिस, कामगारांसाठी राहण्याची व्यवस्था असून त्यांनाही अन्य कामासाठी लागणारे पाणी शुक्रवारी उपलब्ध होऊ शकलेले नाही. त्यामुळे महापालिकेकडून तात्पुरती पाण्याची सोय करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुंबईत सिमेंट काँक्रिट रस्त्यांची कामेही होत असून त्या कामावरही परिणाम होत आहे.
Video Player
00:00
00:00