छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ भडगाव पेठ भागातील शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे शंभर एक तरुण बलिदान मास पाळत आहेत. तरुणांमधील नैराश्य कमी करणे व व्यसनमुक्त करण्याचा उद्देश यावर्षी बलिदान मासानिमित्त ठेवला आहे.
औरंगजेबाने संभाजी महाराजांना ४० दिवस कैदेत ठेवले होते.

त्याचा निषेध व महाराजांच्या धैर्याचे समर्थन म्हणून बलिदान दिवस पाळला जातो. गेल्या वर्षांपासून तालुक्यातील धारकरी तरुण बलीदान मास पाळत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी पूर्वी चाळीस दिवसांचा कालावधी हा बलिदान मास म्हणून पाळला जातो. दररोज रात्री ८ वाजता भडगाव पेठ भागातील श्री हनुमान मंदिरांवर सर्व तरुण जमुन तिथुन प्रत्येक चौकात जाऊन छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून श्री संभाजीसूर्यहृदय श्लोक म्हणतात. ४० दिवस सुखाचा नव्हे सुतकाचा महिना औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ४० दिवस वेदना देऊन त्यांची हत्या केली. हिंदुत्वव स्वराज्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केलेल्या वेदनांची जाणीव राहावी यासाठी बलिदान मास पाळला जातो. या महिन्यात आवडीच्या वस्तु, गोड पदार्थांचा त्याग केला जातो. पायात चप्पल घातली जात नाही, डोक्यावरचे केस काढून मुंडन करून जमिनीवर झोपायचे, संपूर्ण महिना सुखाचा त्याग करीत सूतकाचा महिना पाळला जातो. अशा कृतीतून श्रद्धांजली व बलिदान मास पाळला जातो. शालेय विद्यार्थी, युवक, युवती, महिलांसह धारकरी यामध्ये सहभागी होतात.असे बलीदान मास केंद्र पेठ प्रमुख अशुतोष पाटील यांनी सांगितले..









