
नागपुरातील एका कंपनीत रविवारी मोठा स्फोट झाला. एका खाजगी स्फोटक कंपनीत हा स्फोट झाला असून यात दोन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ‘कंपनीच्या मालकाने सुरक्षेबाबत कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत. स्फोटात दोन श्रमिकांचा मृत्यू झाला. या स्फोट प्रकरणात मालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन मृतक व जखमींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार गट) नेते सलील देशमुख यांनी केली. गुन्हा दाखल न केल्यास आंदोलनाचा इशाराही देशमुख यांनी दिला.
कंपनीच्या एका युनिटमध्ये वाती बनविण्याचे काम सुरू असतानाच दुपारी जेवणाची वेळ झाली. त्यामुळे काही श्रमिक वगळता सात महिला श्रमिकांसह सर्व जण युनिटच्या बाहेर आले. झाडाखाली बसून त्यांनी जेवणाचे डबे उघडले. एक घास घेत नाही तोच अचानक कंपनीत स्फोट झाला. भीषण आग लागली. श्रमिकांनी मिळेल त्या साधनाने आग विझविण्यास सुरुवात केली. सहकाऱ्यांना बाहेर काढण्याचे काम केले. स्फोटात दोन श्रमिकांचा होरपळून मृत्यू झाल्याच्या दृश्याने अन्य श्रमिकांच्या हृदयाचा थरकाप उडाला.सदर येथे राहणाऱ्या सुहेल अमीन यांच्या मालकीच्या या कंपनीत सकाळी ६ ते दुपारी ४ वाजतापर्यंत १५ महिलांसह ३१ श्रमिक काम करतात. घटनेच्या वेळी युनिट व कंपनी परिसरात सात कामगार होते. उर्वरित कामगार जेवणाची वेळ झाल्याने बाहेर गेले होते. तीन वेळा झालेल्या स्फोटात दोघांचा मृत्यू तर तीन जण जखमी झाले. उर्वरित दोघे बचावले. कंपनीच्या आगीची झळ परिसरातील जंगलालाही पोहोचली. जंगतील झाडे जळून राख झाली. स्फोटाची माहिती मिळताच दहशतवाद विरोधी पथक व न्यायवैद्यक प्रयोगशाळेचे अधिकारी तेथे दाखल झाले. या स्फोटामागे घातपात आहे का, याचा तपास एटीएस करणार आहे. तर स्फोट नेमका कशाने झाला, काय चूक झाली , सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या काय, याची तपासणी करून अहवाल सादर करतील. या स्फोटामुळे मालकाने गांधीबोतील एनिशन फायरवर्क्स अँड एक्स्प्लोझिव्ह नावाचे दुकान तातडीने बंद केल्याची माहिती आहे.‘एशियन फायर वर्क्स कंपनीतील स्फोटात जखमी झालेल्या श्रमिकांच्या उपचारात कोणतीही हयगय नको, जखमींना आवश्यक ते उपचार उपलब्ध करून द्या’, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. स्फोटात मृत्यू झालेल्या श्रमिकांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असल्याचेही ते म्हणाले.