लाडकी बहीण योजनेचा लाभ आयकर भरणाऱ्या महिलांनीही घेतला आहे. त्यामुळे अपात्र महिलांनी यातून स्वच्छेने बाहेर पडा, अशी विनंती अजित पवार यांनी केली आहे.राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केलं आहे. ज्या लाडक्या बहिणींचं वार्षिक उत्पन्न २.५ लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न आहे, त्यांनी स्वेच्छेने योजनेतून बाहेर पडावं. तसं न झाल्यास त्यांचे अर्ज फेटाळले जातील, असं अजित पवार म्हणाले.जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयाच्या उद्धाटनावेळी अजित पवार बोलत होते. लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना अजित पवार यांनी दावा केला की, महाराष्ट्र सरकारने निवडणुकीवेळी दिलेलं आश्वासन पूर्ण करत, लाडकी बहीण योजनेसाठी महिला आणि बालविकास विभागाला ३७०० कोटी रुपये दिले आहेत. मात्र ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत, त्या अपात्र लाभार्थ्यांनी स्वेच्छेने या योजनेतून नाव काढावं असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

तसंच लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, ही योजना आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांसाठी आहे. मात्र दुर्दैवाने आयकर भरणाऱ्या महिलाही याचा फायदा घेत आहेत. अशा अपात्र महिलांनी या योजनेतून मागे हटण्याची विनंती मी करतो, जेणेकरून लाडकी बहीण योजनेद्वारे होणारी मदत गरजूंपर्यंत पोहोचू शकेल. तसंच जानेवारी महिन्यातील रक्कम पात्र महिलांना २६ जानेवारीपासून १५०० रुपये मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे.यावेळी त्यांनी महाराष्ट्राबाबत बोलताना सांगितलं, की महाराष्ट्र हे नेहमीच प्रगतीशील विचारांचं आणि सामाजिक समरसतेचं प्रतीक राहिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकता आणि धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने ठाम उभी आहे. आम्ही कोणालाही द्वेष पसरवू देणार नाही किंवा फुटीरतावादी राजकारण करू देणार नाही.दरम्यान, याआधी महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनीही लाडकी बहीण योजनेच्या पैशांबाबत माहिती दिली होती. ज्या महिला अपात्र आहेत, त्यांचे पैसे परत घेणार की नाही, यावर त्यांनी सांगितलं, की ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन या योजनेचा लाभ घेतला आहे, त्यांचे पैसे राज्य सरकारच्या तिजोरीत परत येतील. अर्थ नियोजन विभागाशी आमचा संपर्क सुरू आहे, या विभागाद्वारे रिफंड हेड तयार करुन देतील आणि अपात्र महिलांच्या खात्यातील पैसे परत सरकारच्या तिजोरीत येतील.
Post Views: 5,541