प्रलंबित मानधनामुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांचे काम बंद आंदोलन सुरू..

प्रतिनिधी | जामठी राज्यातील ग्रामीण भागातील गरजू नागरिकांना घरकुल मिळवून देणाऱ्या विविध आवास योजनांची तांत्रिक अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांनी प्रलंबित मानधनाच्या निषेधार्थ २१ जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. मानधन रखडण्याचा प्रश्न महिनोमहिने प्रलंबित असूनही शासनस्तरावर कुठलीही ठोस कार्यवाही न झाल्याने अभियंता संघटना आक्रमक झाली आहे.
या संदर्भात ग्रामीण गृहनिर्माण अभियंता संघटनेने २० जानेवारीला मुंबई येथील महाराष्ट्र राज्य मंत्रालयात निवेदन सादर केले होते. मात्र त्यावर कोणतीही दखल घेतली न गेल्याने मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. गेल्या ९ ते १० वर्षांपासून कंत्राटी तत्त्वावर अत्यंत तुटपुंज्या मानधनावर हे अभियंते काम करत असून, दुर्गम डोंगराळ भाग, पाडे, तांडे व वस्ती स्तरावर जाऊन घरकुलांची तपासणी व अहवाल सादर करण्याचे काम करत आहेत. मात्र, इतक्या वर्षांच्या सेवेनंतरही मानधनात कोणतीही ठोस वाढ झालेली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
या परिस्थितीमुळे ग्रामीण गृहनिर्माण अभियंत्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, प्रलंबित मानधन तातडीने अदा करावे, मानधन वितरण प्रणाली सुलभ करावी, वेळेत मोबदला मिळेल अशी यंत्रणा निर्माण करावी, अशा प्रमुख मागण्या संघटनेने केल्या आहेत. राज्यभर सुरू झालेल्या या काम बंद आंदोलनाचा थेट परिणाम ग्रामीण भागातील गरीब व गरजू लाभार्थ्यांच्या घरकुल योजनांवर होत असल्याने शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.








