दुहेरी निष्ठा : राजकीय प्रवासातील असंतुलित विचारधारा..

राजकारणात निष्ठा ही फक्त शब्दांची जुळवाजुळव नसते; ती प्रत्येक कार्यकर्त्याच्या अस्तित्वाचा पाया असते. मनात संभ्रम निर्माण झाला, परिस्थिती दोलायमान झाली आणि स्वतःच्या नेत्यावरचा विश्वास ढळू लागला की, ‘दुहेरी निष्ठा’ नावाचा धोकादायक विचार जन्म घेतो. अशा वेळी कार्यकर्त्याचा मार्ग गोंधळात पडतो, भूमिका कमकुवत होते आणि प्रवासाचा अर्थही हरवतो.
एखाद्या पक्षात काम करणे म्हणजे ध्वज फडकवण्यापेक्षा खूप मोठं कार्य असतं. सुरुवातीपासून पक्षाने आपल्यावर दाखवलेला विश्वास, दिलेली संधी, मिळवून दिलेली ओळख आणि मान–पद हे केवळ पदकं नाहीत, तर आयुष्यभराची देणगी असते.
ज्या पक्षाने आपल्याला नाव दिलं, पद दिलं, व्यासपीठ दिलं; त्या पक्षाला आणि त्या पक्षाच्या नेत्याला आपण किती लवकर विसरतो याचाही गंभीर विचार करायला हवा. कृतघ्नतेची ही प्रवृत्तीच दुहेरी निष्ठेची सुरुवात बनते आणि कार्यकर्त्याची खरी ओळख धूसर करते.
निवडणुका तर येतात–जातात; पक्षात येणं-जाणं चालू राहतात. पण पक्षनिष्ठा हे राजकीय आयुष्याचं अदृश्य कवच असतं. पद मिळालं तर स्वीकारायचं, पद गेलं तर नाराजी न दाखवता काम करत राहायचं हीच खरी बांधिलकी. म्हणूनच, संघटनेप्रती निष्ठा ठेवणारा कार्यकर्ता कितीही कठीण परिस्थिती आली तरी दिशाहीन होत नाही.
आजच्या राजकारणात स्वार्थाचा जाळ अधिक घनदाट होत चालला आहे. क्षणिक फायद्यासाठी दोन ठिकाणी पाय ठेवण्याचा मोह कार्यकर्त्यांना भुरळ घालतो.
पण इतिहास नेहमी निष्ठावंतांचेच स्मरण ठेवतो, कारण विचारांशी प्रामाणिक राहणाऱ्यांचीच ओळख टिकून राहते. प्रत्येक कार्यकर्त्याने स्वतःला प्रश्न विचारायलाच हवा मी पक्षाचा मान वाढवत आहे का, की फक्त परिस्थितीनुसार निष्ठा बदलत चाललो आहे ?

उत्तर स्पष्ट असेल, तर प्रवासही स्थिर आणि सन्मानाने पुढे जातो. ॲड जमील देशपांडे








