Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा उपोषण करणार असल्याची घोषणा करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी मुंबई हायकोर्टाने नाकारली आहे. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोर्टाने हे निर्देश दिले असून, यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण आंदोलन करण्यास मुंबई हायकोर्टाने मंगळवारी मनाई केली. तसेच नवी मुंबईत खारघर किंवा अन्यत्र परवानगी द्यावी, असे निर्देश हायकोर्टाने राज्य सरकारला दिले. त्यामुळे मुंबईतील आंदोलनाच्या भूमिकेविषयी जरांगे पाटील यांची कोंडी झाली आहे, तर राज्य सरकारला दिलासा मिळाला आहे.
‘जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन केल्यास प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलनकर्ते शहरात जमतील. त्यामुळे जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता असल्याने आझाद मैदानमध्ये उपोषण आंदोलन करण्यास मनाई करावी’, अशा विनंतीची जनहित याचिका ‘एएमआय फांऊडेशन’चे अनिलकुमार मिश्रा यांनी अॅड. महेंद्र रत्न यांच्यामार्फत केली आहे. याविषयी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
‘उद्या, बुधवारपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. मुंबईत सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने आधीच प्रचंड गर्दी असते. अशा परिस्थितीत मराठा समाजाच्या आरक्षण प्रश्नावर मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदान येथे उपोषण आंदोलन केले तर प्रशासनावर प्रचंड ताण येईल. आंदोलनासाठी नवी मुंबईतील विशिष्ट जागा निश्चित करून दिली जाऊ शकते. शिवाय आझाद मैदानातील कोणत्याही आंदोलनाच्या बाबतीत कमाल पाच हजार लोकांच्या जमावासह अनेक अटी घालणारी अंतिम नियमावली राज्य सरकारने यापूर्वीच उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे केलेली आहे. ती नियमावली आजच अधिसूचित केली जाईल’, असे म्हणणे राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ व मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारीया यांनी मांडले. त्यानंतर ‘मुंबईतील रहदारी आणि जनजीवन विस्कळीत होऊ नये, यादृष्टीने मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलनाला परवानगी देण्यात येऊ नये. त्याऐवजी नवी मुंबईत खारघर अथवा अन्यत्र परवानगी देण्याचा विचार करावा’, असे निर्देश खंडपीठाने दिले.
दरम्यान, गणेशोत्सव काळात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषणाला बसणे टाळावे, अशी विनंती करण्यासाठी आज, मंगळवारी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्य अधिकारी राजेंद्र साबळे हे अंतरवाली सराटी येथे दाखल झाले होते. साबळे यांनी जरांगे यांच्यासोबत याबाबत चर्चाही केली. मात्र, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय आता माघार घेणार नाही, अशी ठाम भूमिका जरांगे यांनी मांडली. ‘चार महिन्यांपूर्वीच आम्ही मुंबईला जाण्याची घोषणा केली होती. दोन महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री आणि आमदारांशी बोलणे झाले. तरीही सरकारने काहीही केलं नाही. त्यामुळे आता 27 ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईकडे निघणार आहोत’, असं मनोज जरांगे यांनी सोमवारीही स्पष्ट केलं होतं. या पार्श्वभूमीवर, आता हायकोर्टानेच मुंबईतील आंदोलनाला मनाई केली असल्याने जरांगे पाटील काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








