तेलंगणातील भाजप आमदार टी. राजा सिंह यांनी वादग्रस्त विधानांमुळे आणि राज्य नेतृत्वाशी असलेल्या मतभेदांमुळे पक्षाकडे राजीनामा पाठवला आहे. गोशामहल मतदारसंघाचे ते तीन वेळा आमदार राहिले आहेत.हैदराबाद: तेलंगणातील भाजपचे आमदार टी. राजा सिंह ऊर्फ टायगर राजा यांनी पक्षाकडे राजीनामा पाठवला आहे. आपल्या वादग्रस्त विधानांमुळे राजा सातत्यानं चर्चेत असतात. ते गोशामहालचे तीन टर्मचे आमदार आहेत. राज्यातील नेतृत्त्वाशी असलेल्या वादामुळे राजा यांनी पक्ष सोडत असल्याची घोषणा केली. राजा सिंह यांनी त्यांचा राजीनाम्याचं पत्र सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
‘गप्प राहण्याला अनेकांनी सहमती समजू नये. मी केवळ माझ्यासाठी नव्हे, तर असंख्य कार्यकर्ते आणि मतदारांच्या वतीनं बोलत आहे. कार्यकर्ते आणि मतदार आपल्या पाठिशी, आपल्यासाठी पूर्ण विश्वासानं उभे राहिले. आज त्यांच्या पदरी निराशा पडली आहे. जय श्रीराम,’ असं राजा सिंह यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे.गोशामहाल विधानसभा मतदारसंघाचं सलग तिसऱ्यांदा प्रतिनिधीत्व करत असलेल्या राजा यांनी काही दिवसांपूर्वीच एक व्हिडीओ मेसेज शेअर केला होता. त्यातून त्यांनी पक्ष नेतृत्त्वाकडे आपल्याला प्रदेशाध्यक्षपद देण्याचं आवाहन केलं होतं. आपल्याला प्रदेशाध्यक्ष मिळावं अशी असंख्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. त्यासाठी अनेकांनी फोन केले. मला पक्ष नेतृत्त्वानं संधी द्यावी, असं राजा सिंह म्हणाले होते.प्रदेशाध्यपदावर नियुक्त झाल्यावर आपण काय करणार, याची संपूर्ण रुपरेखा राजा सिंह यांनी मांडली होती. पक्षात एक गोरक्षा आघाडी स्थापन करुन आणि गोरक्षेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी ढाल म्हणून उभे राहू. भाजपचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचा संकल्प हाती घेऊ आणि पक्षाची ओळख एक हिंदुत्त्ववादी संघटना म्हणून तयार करु, असा मानस राजा सिंह यांनी बोलून दाखवला होता.भाजपकडून वरिष्ठ नेते एन. रामचंदर राव यांच्याकडे तेलंगणाचं प्रदेशाध्यक्षपद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. पक्षातील सुत्रांनी सोमवारी याबद्दलची माहिती दिली. केंद्रीय नेतृत्त्वानं भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी राव यांच्या नेतृत्त्वाला मंजुरी दिल्याचं सांगितलं जात आहे. उच्च न्यायालयात वकील असलेले आणि विधान परिषदेचे माजी सदस्य एन. रामचंदर राव त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतील. केंद्रीय नेतृत्त्वानं आपला कल स्पष्ट केला असल्यानं अन्य कोणता नेता मैदानात उभा राहण्याची शक्यता नाही.









