सांगली जिल्ह्यात विहिरीत बुडून दोघांचा मृत्यू झाला. ते पोहण्यासाठी विहिरीत उतरले, पण बुडाले. रेस्क्यू टीमने दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. आष्टा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. दोघांच्या मृत्यूने परिसरात शोककळा पसरली आहे.विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा सांगलीच्या वाळवा तालुक्यातील खोतवाडी या ठिकाणी बुडून मृत्यू झाला आहे. केराप्पा धोंडीराम बागडी, वय वर्ष २७ आणि अजय पप्पन बागडी, वय वर्ष १९ राहणार दोघेही, नागाव रोड झोपडपट्टी, आष्टा, अशी मृत तरुणांची नावं आहेत. दोघे ही दुपारच्या सुमारास खोतवाडी येथे एका शेतात असणाऱ्या विहिरीमध्ये पोहोण्यासाठी गेले होते, मात्र पोहता येत नसल्याने या दोघांचाही बुडून मृत्यू झाला आहे.
या घटनेची माहिती मिळतात रेस्क्यू फोर्स टीमकडून ४० फूट खोल विहिरीतून अथक प्रयत्नानंतर दोघांना शोधून काढण्यात आलं आहे. सदर घटनेची नोंद आष्टा पोलिसांत नोंद झाली आहे.३० एप्रिल रोजी दुपारी दोनच्या सुमारास नागाव रोडवरील वसाहती मधील पाच ते सहा तरुण बागणी रस्त्यावरील जगन्नाथ धोंडीराम मस्के यांच्या विहिरीत पोहायला गेले होते. यामधील केरप्पा बागडी याला पूर्णपणे पोहायला येत नव्हतं. विहिरीत केरबा बागडी बुडायला लागला आणि त्याने पुतण्या अजय बागडीला मिठी मारली. तेथील इतर तरुणांना लक्षात आलं नाही की दोघेही बुडत आहेत. बराच वेळ झाला दोघेही पाण्याच्या बाहेर आले नाहीत. त्यानंतर इतर तरुणांना ते विहिरीतील खोल पाण्यात बुडाल्याचं समजलं.









