ऐश्वर्या सांगते की, ‘तुम्ही नेमकी कशी उत्तरे देणे अपेक्षित आहे, हे तुम्हाला समजायला हवे. पहिल्या दोन प्रयत्नात मी त्यात कमी पडले. परंतु यावेळी मात्र मी ते समजून घेऊन त्याप्रमाणे अभ्यास केला. अनेकदा बाजारातल्या टेस्ट सीरिजच्या नादात आधीच्या परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होते. परंतु या प्रश्नांआधारे अभ्यास करणे गरजे असते. ‘इंटरव्ह्यू’ची तयारी करतानाही ‘मॉक इंटरव्हा’, परीक्षा देणाऱ्या मित्र-मैत्रिणींसोबतचे ‘ग्रुप डिस्कशन’ याचा नक्कीच फायदा होतो.’कोव्हिडचा कालावधी माझ्या करिअरला वेगळे वळण देणारा ठरला. या काळात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामाचे महत्त्व मला समजले आणि एम.टेक. करण्याऐवजी मी प्रशासकीय सेवेत येण्याचा निर्णय घेतला.’ अवघ्या २५ व्या वर्षी ‘यूपीएससी’त देशात १६१ वी येण्याचा मान मिळविणाऱ्या ऐश्वर्या जाधवने ‘महाराष्ट्र टाइम्स’शी संवाद साधत यशाचा प्रवास उलगडला.
नाशिकमधील पंचवटी परिसरातील उत्तरानगर येथील ऐश्वर्या मिलिंद जाधवने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत देशात १६१ वी येण्याचा मान मिळविला. तिसऱ्या प्रयत्नात ऐश्वर्याने हे यश मिळविले आहे. मिलिंद आणि सुवर्णा जाधव या व्यावसायिक दाम्पत्याची मुलगी असलेल्या ऐश्वर्याने रायन इंटरनॅशनल स्कूल आणि सेंट लॉरेन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये अनुक्रमे शालेय व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतले. त्यानंतर तिने मुंबईच्या ‘व्हीजेटीआय’ कॉलेजमधून बी.टेक. सिव्हिलपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. दहावीत ९६ टक्के, बारावीत ८५ टक्के मिळविणाऱ्या ऐश्वर्याला एम.टेक. करण्याची इच्छा होती. सन २०२१ मध्ये बी.टेक. पदवी हातात असताना मात्र, ऐश्वर्याने निर्णय बदलला. डिसेंबर २०२१ मध्ये ‘यूपीएससी’चा अभ्यास सुरू केला.त्यानंतरच्या दोन प्रयत्नांत ती प्रीलिम्सही उत्तीर्ण होऊ शकली नाही. परंतु तिसऱ्या प्रयत्नात तिने थेट १६१ वी रैंक मिळविली.









