विधानसभा निवडणुकीत जोरदार आपटी खाल्ल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. विधानसभेला महाविकास आघाडीची सत्ताधारी महायुतीसमोर अक्षरश: धूळधाण उडाली.मुंबई: विधानसभा निवडणुकीत जोरदार आपटी खाल्ल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे मुंबईत आरपारच्या लढाईसाठी सज्ज झाले आहेत. विधानसभेला महाविकास आघाडीची सत्ताधारी महायुतीसमोर अक्षरश: धूळधाण उडाली. महाविकास आघाडीला मिळून ५० चा आकडादेखील ओलांडता आला नाही. शिवसेना उबाठाला २० जागा मिळाल्या. यातील निम्म्या जागा त्यांनी मुंबईत जिंकल्या. आता ठाकरेंना पुन्हा एकदा मुंबईत वर्चस्व सिद्ध करावं लागणार आहे.
मुंबई महापालिकेवर गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेची सत्ता आहे. २०१७ मध्ये भाजपनं शिवसेनेला थेट अंगावर घेतलं. पण अटीतटीच्या लढतीत शिवसेनेनं भाजपपेक्षा २ जागा जास्त जिंकल्या आणि सत्ता स्थापन केली. आता शिवसेनेतील फुटीनंतर भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता काबीज करायची आहे. ठाकरेंची कमी झालेली ताकद आणि शिंदेसेनेचं मुंबईतील मर्यादित वर्चस्व यांचा फायदा घेत मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच भाजपचा महापौर बसवण्याची संधी सत्ताधारी पक्षाकडे आहे.दुसरीकडे विधानसभेतील पराभवानंतर उद्धव ठाकरेंनी सगळं लक्ष मुंबई महापालिकेवर केंद्रीत केलं आहे.
मुंबई महापालिकेत यश मिळाल्यास ठाकरेंच्या राजकारणाला संजीवनी मिळू शकेल. ठाकरेंनी मुंबईसाठी स्वतंत्र निरीक्षक नेमून त्यांच्याकडून वारंवार परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तळागाळातला शिवसैनिक, गटप्रमुख, शाखेत नियमित येणारा शिवसैनिक, अनेक शाखाप्रमुख आजही ठाकरेंसोबत असल्याचं ठाकरेंच्या लक्षात आलेलं आहे. शाखा नेटवर्क हीच ठाकरेंची मुंबईतील खरी ताकद आहे. पक्षातील बंडानंतरही ती शाबूत आहे. त्यामुळेच ठाकरेसेनेला विधानसभा निवडणुकीत १० उमेदवार निवडून आणता आले.तळागाळातील शिवसैनिक, गटप्रमुख, शाखाप्रमुख, शाखासंघटक यांची तगडी फळी ठाकरेंकडे आहे. तब्बल ५५ हजार जणांचा नोंदणीकृत वर्ग आजही ठाकरेंसोबत आहे. ६ स्वतंत्र निरीक्षकांनी घेतलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आलेली आहे. याच शिवसैनिकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठाकरे करत आहेत. मुंबई महापालिकेची निवडणूक काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीशिवाय, कोणतीही आघाडी न करता लढण्याची ठाकरेंची तयारी आहे.एकीकडे मुंबईतील तळागाळातील शिवसैनिक आणि पदाधिकारी ठाकरेंसोबत असताना दुसरीकडे मधल्या फळीतील नेत्यांना आत्मविश्वास वाटत नाही. हीच ठाकरेंसाठी महत्त्वाची अडचण आहे. मधल्या फळीतील नेते ठामपणे उभे राहताना दिसत नाही. नेतृत्व आणि शेवटचा कार्यकर्ता स्वबळावर आरपारची लढाई करण्यासाठी सज्ज असताना मधल्या फळीतील नेत्यांना नसलेला आत्मविश्वास हीच ठाकरेंची समस्या आहे.
Post Views: 5,304