जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा-2025 ला जळगावात उत्साहात प्रारंभ.जळगाव, महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा-2025 या उपक्रमाचा शुभारंभ नियोजन समितीच्या सभागृह उत्साहात पार पडला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. आयुष प्रसाद होते. यावेळी जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता यशवंत भदाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुर्बान तडवी,
जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पंधरवड्याचा प्रमुख उद्देश महामंडळांचे सक्षमीकरण, शेतकऱ्यांशी सुसंवाद व तक्रार निवारण, पाण्याचा अपव्यय कमी करणे, सांडपाण्यावर प्रक्रिया व पुनर्वापर तसेच पाणी वापराबाबत जनजागृती करणे हा आहे. यामाध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यात येणार असून,
पाण्याच्या शाश्वत वापरासाठी जनतेला सहभागी करून घेण्यावर भर देण्यात येणार आहे.जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या भाषणात पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन काळाची गरज असल्याचे सांगून शासकीय यंत्रणांनी नागरिकांच्या सहभागातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन केले.









