गढूळ पाणी प्रश्नी धरणगावातील महिलांचा नगरपरिषदेवर एल्गार.. ‘पाणी पिऊन दाखवा, लाखाचे बक्षीस मिळवा’ अशी ऑफर मोर्चेकरांकडून करण्यात आली.
धरणगाव तालुका प्रतिनिधी – राजु बाविस्कर,
धरणगाव : पावसाळा सुरू झाल्यापासून गेल्या अनेक दिवसांपासून नळाला गढूळ पाणी येत असून या पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. मातीमिश्रीत पिवळसर पाणी नागरिकांना नाईलाजाने प्राशन करावे लागत आहे. तर वितरण व्यवस्थेतील दोषामुळे अनेक भागात पाणी पोहचतच नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात शहरवासीयांना विकतचे पाणी घेण्याची वेळ आली आहे. नगरपरिषदेच्या दुर्लक्षितपणाबाबत संतापलेल्या नागरिकांनी आज रोजी मातीमिश्रित, चिखलयुक्त पिवळसर गढूळ पाण्याच्या बॉटल सोबत घेत नगरपरिषदेवर मोर्चा काढत प्रशासनाच्या कारभाराबद्दल रोष व्यक्त केला. मागील दोन वर्षात जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असताना देखील धरणगाव शहरातील पाणीटंचाई प्रश्न कायम आहे. मुबलक पाणी उपलब्ध असताना देखील पाणीपुरवठ्याच्या योग्य नियोजनाअभावी नागरिकांना आठ ते दहा दिवसांत, वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. शहरातील विविध पक्षांकडून व नागरिकांनी वारंवार तक्रारी करुनही पाणीप्रश्न तडीस जात नसल्याने आज रोजी संतप्त नागरिकांनी एल्गार करीत धरणगाव नगरपरिषदेवर धडक दिली. महिला पुरुष तसेच आबालुद्ध नगरपालिकेवर धडकले.












